Monday, August 20, 2007

राजगड

राजगड. राजांचा गड किंवा गडांचा राजा काहीही म्हणा पण मनाला भुरळ पाडणारा आहे खरा. मावळ खोर्‍यावर करडी नजर ठेवता येण्यासारख्या जागी असलेला. २६ वर्षे मराठी राज्याची राजधानी असलेला गड. राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

शनिवारीच राजगडावर जाण्याचा योग आला. एका व्यावसायिक ट्रेकर्स ग्रुप बरोबर आम्ही सहा मित्र राजगडावर गेलो. पुणे सातारा रस्त्यावर नसरापूर फाट्याला आत वळालो आणि गुंजवणे गावात आलो. तशा गडावर जाण्याच्या तीन वाटा आहेत. चोर दरवाजा, पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा. सध्या थोड्या पडझडीमुळे गुंजवणे दरवाजा वाट बंद आहे म्हणून आम्ही चोरवाटेने गडावर जायचं ठरवलं.

गुंजवणे गाव एकदम टुमदार म्हणतात तसं आहे. भाताची खाचरं, विहीर, त्यावर पाणी शेंदण्यासाठी रहाट, शेजारून खळखळत वाहणारा ओढा, पलीकडे भवानीआईचं मंदिर आणि घनदाट झाडी. बस थांबली तिथे पोटापाण्याची सोय झालीच आणि फक्कड चहा पिऊन राजगडाच्या वाटेला लागलो. मोठ्या आणि सर्व वयोगटातील माणसांचा समावेश असलेल्या ग्रुपबरोबर असल्याने चालण्याचा वेग तसा मंदच होता. पण त्यामुळे आम्हाला भरपूर विश्रांती मिळाली आणि दमणूक झाली नाही. एकामागून एक डोंगर पार करत पद्मावती माचीच्या पायथ्याला पोहोचलो. अचानक उभी चढण समोर लागली. तशा छोट्या छोट्या पायर्‍या आणि बाजूला लोखंडी कठडे आहेतच. पण तरीही सवय नसणार्‍यांनी जरा काळजी घेणे आणि डोंगराच्या बाजूने चढणे उतरणे, शरीराचा भार चढताना पुढे व उतरताना मागे/सरळ देणे अशी पथ्ये पाळणे आवश्यक आहे. हा चढणीचा टप्पा ओलांडला की चोरवाटेचा छोटा दरवाजा अचानक समोर येतो. आणि लगेच आपण पद्मावती तळ्यासमोरच निघतो. इतक्या उंच ठिकाणी एवढं भव्य तळं पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. पद्मावती मंदिरात ३० एक जण व्यवस्थित राहू शकतील. थोडा वे़ळ थांबून बॅगमधले खाण्याचे पदार्थ पोटात टाकून पुढे निघालो.

इथून थोडं वर आलं की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. संध्याकाळी परत पुणे गाठायचे असल्याने आम्ही फक्त बालेकिल्ला पाहायचा म्हणून सरळ गेलो. राजगडाचा बालेकिल्ला जणू किल्ल्यावर किल्ला असल्यासारखा आहे. माझा एक मित्र म्हणाला होता की राजगड जिथे संपला असे वाटते तिथून सुरु होतो. आता ते अक्षरशः पटते. रिमझिम पाऊस, बाजूचे घनदाट झाडी यामुळे ही वाट मला थोडी झपाटल्या वाटेसारखी(हाँटिंग) वाटली. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. इथेही थोडा शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. आमच्या सोबतच्या एक काकू तिथून परत जात होत्या. पण सोबतच्या काही जणांनी विश्वास दिल्यावर त्याही बालेकिल्ल्यावर आरामात आल्या.

बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे , एक ब्रम्हर्षी मंदिर आहे. आमच्या गाईडनुसार भारतातील ब्रम्हदेवाच्या मोजक्या मंदिरांपैकी हे एक. राजवाडा, सदर, दारूकोठाराचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याची भव्यता, राजधानीच्या जागेची निवड पाहून छाती भरून येते. इंग्रजांनी तोफा लावून किल्ल्यांवरची बांधकामे आणि पायर्‍या उध्वस्त केल्या आहेत. बालेकिल्ल्यावर काही वेळ थांबून आम्ही परत फिरलो. चढणे सोपे उतरणे अवघड हे ऐकलेले वाक्य अनुभवायला मिळाले. तकलादू कठड्यांना धरत पायर्‍यात कोरलेल्या खोबणींचा आधार घेत आधीची उभी चढण उतरलो. बालेकिल्ला उतरून मघाच्या तिठ्यावर येऊन थांबलो. अजून बाकीचे उतरायला आणि एकंदरीत बराच वेळ हाताशी होता. तेव्हा संजीवनी माचीवर जाऊन येण्यासाठी मुख्य व्यवस्थापकाला गळ घातली. मग बालेकिल्ल्याला उजव्या बाजूने वळसा घालून संजीवनी माचीच्या सुरुवातीला पोहोचलो. चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. चिलखती म्हणजे दुहेरी तटबंदी. शत्रूसैन्याने जीवाचं रान करून बाहेरील तटबंदी पाडली की त्याला आतली तितकीच भक्कम दुसरी तटबंदी दिसते. अवसान गळाल्यासारखी अवस्था होते त्याची. शत्रू पुन्हा तयारी करेपर्यंत मावळे बाहेरील तटबंदी पुन्हा बांधून घ्यायचे. सोबतच्या लहान मुलांचे पाय आता पुरे म्हणू लागल्याने संजीवनी माची अर्धी पाहीली आणि मागे वळालो.

पद्मावती माची शेजारी एक पुरातत्व खात्याची कचेरी आहे. तिथे गरमागरम चहा पिलो. खरोखर अमृततुल्य वाटला. जान मे जान आ गई. मग किल्ला उतरायला सुरुवात झाली आणि पावसालाही. कधी रपरप तर कधी भुरभुर पाऊस पडत होता. मजा येत होती. पण आधी जी सोपी वाट होती तीच पावसाने भयंकर निसरडी झाली होती. आणि आम्हा सहा जणांपैकी सर्व सहाजण एकेकदा तरी सपशेल धरणीप्रिय झाले. एकेक पाऊल टाकत कधी हातही बाजूला टेकवत एकदाचे मैदानात आलो. सर्वांचे कपडे लाल रंगात रंगले होते. तसेच गेलो आणि गावातल्या ओढ्यात बसलो. हातपाय धुऊन कपडे बदलून पुन्हा एकदा अमृततुल्य चहा घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. सकाळी ६.३० ला निघून रात्री ८.३० ला परत पुण्यात आलो.

किल्ल्यावर पहायची राहिलेली ठिकाणे बरीच आहेत. तेव्हा पुन्हा एकदा राजगडाला मुक्कामी जाणे क्रमप्राप्त आहे.

Labels: ,

2 Comments:

At 3:37 PM, August 20, 2007 , Anonymous Anonymous said...

vachat nasoon me gaDavar bhaTaktoy asach vaTala:-) mast post :-))

 
At 9:39 AM, May 22, 2009 , Blogger रोहन... said...

i always love reading about trekking & forts ... nice one ...

My article is here .. do read it ...

http://mazisahyabhramanti.blogspot.com/2009_05_01_archive.html

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home